पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याचा ऐतिहासिक मानबिंदू म्हणजे शनिवारवाडा. हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या पेशव्यांचे शौर्य, वैभव याचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याला मंगळवारी, २२ जानेवारी २०१९ रोजी तब्बल २८७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त वाड्याच्या भक्कम तटबंदीसोबत उभा असलेला भव्य दिल्ली दरवाजा उघडण्यात आला होता. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाज्याने २२ जानेवारी १७३२ ते २२ जानेवारी २०१९ एवढा प्रदीर्घ काळ अनुभवला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त वर्षातून एकदाच हा दिल्ली दरवाजा उघडण्यात येतो. त्यामुळे नागरिकांनी येथे गर्दी केली होती. दरवाजा उघडताच, टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष करत उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), कुंदनकुमार साठे, अनिल नेने आदी उपस्थित होते. या वेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी बोलताना मोहन शेटे म्हणाले, ‘ दहा जानेवारी १७३० रोजी वाड्याचे भूमिपूजन झाले होते, तर २२ जानेवारी १७३२ रोजी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली होती. शनिवारवाडा हा मराठ्यांचा मानबिंदू आहे. जगात केवळ दोन ठिकाणी असलेल्या कारंज्यांपैकी एक कारंजे शनिवारवाड्यात आहे. कात्रजपासून आणलेली दगडी पाइपलाइन हेदेखील आश्चर्य आहे.’
उदयसिंह पेशवा म्हणाले, ‘शनिवारवाड्यातील अनेक गोष्टींची आज दुरवस्था झालेली आहे. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’